
विदर्भासहित संपूर्ण महाराष्ट्र वाढत्या तापमानामुळे हैराण असतांनाच एक गोड बातमी हाती आलीये. देशभरातील नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार नैऋत्य मान्सूनने अंदमान-निकोबार बेटांमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे.
मान्सून सध्या अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये सक्रिय झाला असून पुढील ३ ते ४ दिवसांत तो आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार २६ ते ३१ मे दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होईल.
त्यानंतर साधारण एका आठवड्यात तो महाराष्ट्राच्या सीमेवर पोहोचू शकतो. म्हणजेच ६ जूनच्या आसपास कोकणात मान्सूनची पहिली दमदार एन्ट्री होण्याची शक्यता आहे. यानंतर हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा विस्तार होईल. पण दुसरीकडे विदर्भात उष्णतेचा कहर कायम आहे. अमरावती आणि वर्धा येथे तापमान तब्बल ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.
अकोला, यवतमाळ आणि ब्रह्मपुरीमध्येही ४५ अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. नागपूरमध्येही पारा ४३.८ अंशांवर गेला असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम राहू शकते.
मात्र मान्सूनच्या हालचाली वेगाने सुरू असल्याने लवकरच उष्णतेपासून दिलासा मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.





