
राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर आलीये. आता वैद्यकीय खर्चासाठी हेलपाटे मारण्याची गरज कमी होणार असून कॅशलेस उपचारांची सुविधा मिळणार आहे.
मंडळी, शंभर टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कॅशलेस वैद्यकीय सुविधा मिळणार आहे. यामुळे रुग्णालयातील बिलांची परतफेड मिळवण्यासाठी शिक्षण विभाग, जिल्हा परिषद आणि वैद्यकीय कार्यालयांचे फेरे मारावे लागणार नाहीत.
आतापर्यंत वैद्यकीय प्रतिपूर्ती बिलासाठी कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. काही ठिकाणी टक्केवारी द्यावी लागत असल्याचे आरोपही होत होते. पण आता ही संपूर्ण प्रक्रिया बदलणार आहे. यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट म्हणजेच ‘आभा कार्ड’ काढणे अनिवार्य करण्यात आले आहे.
शिक्षण संचालनालयाने याबाबत राज्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना २२ मे २०२६ रोजी निर्देश दिले आहेत. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना प्रतिकुटुंब दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य संरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
महत्वाची बाब म्हणजे, आता ५ लाखांपर्यंतच्या वैद्यकीय खर्चासाठी जुन्या पद्धतीची प्रतिपूर्ती बिले स्वीकारली जाणार नाहीत. म्हणजेच पुढील काळात थेट कॅशलेस उपचारांवर भर असणार आहे. मंडळी, हा निर्णय हजारो शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार हे नक्की.





