
राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा येथे कार आणि ॲपे रिक्षामध्ये झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चांगुनाबाई भिमा पवार आणि त्यांचे पती भिमा बाबुराव पवार हे राहुरीहून डिग्रसकडे ॲपे रिक्षाने जात होते. डिग्रस फाट्याजवळ रिक्षा वळत असताना नगरकडून येणाऱ्या कारची जोरदार धडक बसली. धडकेनंतर रिक्षा दोन ते तीन पलट्या होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन पडली.
या अपघातात चांगुनाबाई भिमा पवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रिक्षाचालक सिताराम उर्फ तात्या सिताराम शिंदे, भिमा बाबुराव पवार, तसेच कारमधील दीपक संभाजी हारे, रोहिणी दीपक हारे आणि त्यांचा मुलगा जखमी झाले. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करून सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वाहन चालवताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.





