
अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी जिद्द असेल, तर यश मिळवता येतं, याचं जिवंत उदाहरण पारनेरमधून समोर आलंय. मंडळी, पारनेर शहरातील जिजामाता विद्यालयाचा विद्यार्थी जयदीप औटी, नववीत असताना त्याच्या उजव्या हाताची बोटे कडबा कुट्टीत गेली. यानंतर त्याला तीन महिने रुग्णालयात उपचार घ्यावे लागले.
उजव्या हाताची बोटे गेल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न होता पुढे शिक्षण कसं करायचं? लिहायचं कसं? पण जयदीप इथे थांबला नाही, त्याने हार मानली नाही. त्याने डाव्या हाताने लिहायला शिकण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी सतत सराव सुरू केला. हळूहळू त्याने डाव्या हाताने लिहिण्यावर प्रभुत्व मिळवलं आणि दहावीच्या परीक्षेत त्याने सर्व पेपर डाव्या हातानेच लिहिले. आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देत जयदीपने तब्बल ८५ टक्के गुण मिळवले.
या यशामागे त्याची जिद्द, मेहनत आणि कुटुंबियांचं मोठं पाठबळ आहे. त्याचे आई-वडील, मामा आणि शाळेतील शिक्षकांनी त्याला सतत साथ दिली. जयदीपच्या या जिद्दीचं सर्वत्र कौतुक होत असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही त्याचं अभिनंदन करत जयदीपचं हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे असे म्हटले. मंडळी एक लाईक जयदीपसाठी तर बनतोच..





