
अहिल्यानगरमधून मोठी ब्रेकिंग बातमी समोर आलीये. जलजीवन योजनेतील अनियमिततेची आता स्वतंत्र चौकशी होणार असून संबंधितांवर कारवाई होण्याचे संकेत मिळालेत.
मंडळी, जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले. ग्रामीण भागात पाणीटंचाई गंभीर होत असताना योजनांची कामे अपूर्ण का आहेत, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
“उद्भव नसताना योजना पूर्ण केल्याचं दाखवता, मग लोकांनी हवा प्यायची का?” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असताना त्यांची पाहणी का झाली नाही, यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. याच बैठकीत त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, जलजीवन मिशन योजनेतील अनियमिततेची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कारवाई केली जावी.
तसेच पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकर व्यवस्थापनावरही त्यांनी भर दिला. टँकरचे वेळापत्रक वीज वितरण कंपनी आणि पंचायत समितीने तयार करून ते जनतेसाठी खुले ठेवावे, असेही आदेश देण्यात आले आहेत.
मंडळी, एकीकडे पाणीटंचाई आणि दुसरीकडे योजनांमधील अनियमितता , त्यामुळे आता प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. पुढील काही दिवसांत या चौकशीतून नेमकं काय समोर येतं, आणि खरंच कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





