
कामगारांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे, आता असंघटित क्षेत्रातील कामगारांना दरमहा तीन हजार रुपयांची पेन्शन मिळू शकते. मंडळी, केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना राबवली जात आहे.
या योजनेअंतर्गत १८ ते ४० वयोगटातील आणि महिन्याला १५ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कामगारांना सहभागी होता येते. यामध्ये कामगारांना दरमहा फक्त ५५ ते २०० रुपये इतका छोटासा हप्ता भरावा लागतो. यानंतर वयाच्या ६० वर्षांनंतर त्यांना दरमहा निश्चित ३ हजार रुपयांची पेन्शन मिळते. म्हणजेच छोट्या बचतीतून मोठा आधार मिळू शकतो. या योजनेत आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या जोडीदाराला ५० टक्के म्हणजेच १५०० रुपये पेन्शन मिळते.
पात्रतेबद्दल बोलायचं झालं, तर घरकाम करणारे, बांधकाम कामगार, रिक्षाचालक, फेरीवाले, शेतमजूर अशा असंघटित क्षेत्रातील कामगार या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र अर्जदाराचे मासिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी असावे आणि तो ईपीएफओ, ईएसआयसी किंवा एनपीएसचा सदस्य नसावा. तसेच तो आयकरदाता नसावा.
मंडळी, ही योजना छोट्या हप्त्यांतून मोठी सुरक्षितता देणारी आहे. त्यामुळे पात्र असलेल्या प्रत्येक कामगाराने याचा लाभ घ्यायला हवा.





