
दररोजच्या व्यवहारांसाठी UPI वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. २ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI व्यवहारांवर शुल्क आकारणीचा मार्ग केंद्र सरकारच्या नव्या अधिसूचनेमुळे मोकळा झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
मात्र, या निर्णयाचा थेट फटका ग्राहकांना बसणार नसल्याचं सांगितलं जात आहे. २ हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार शुल्कमुक्त राहतील. तर २ हजारांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारासाठी शुल्क किती असावं, हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ठरवणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे हे शुल्क दुकानदारांकडून आकारलं जाणार आहे. व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला २ हजारांपेक्षा जास्त रक्कम UPIने पाठवली, तरी त्यावर शुल्क लागणार नसल्याचं सांगितलं जात आहे.
मात्र, दुकानदारांकडून ग्राहकांकडे अतिरिक्त शुल्क मागितलं जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या UPI व्यवहारांवर ग्राहक आणि दुकानदारांमध्ये वाद निर्माण होणार का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.





