
ना 100, ना 101! आता कोणतीही आपत्कालीन मदत हवी असल्यास लक्षात ठेवा फक्त एकच नंबर – 112. सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्देशांनंतर देशभरातील आपत्कालीन हेल्पलाइन व्यवस्था एकत्रित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अपघात, वैद्यकीय आणीबाणी, आग, महिला सुरक्षा किंवा इतर कोणत्याही संकटाच्या वेळी नागरिकांना वेगवान मदत मिळावी यासाठी 112 हा एकमेव राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक म्हणून अधिक प्रभावीपणे कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले की, वेळेत उपचार आणि मदत मिळणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे.
याच पार्श्वभूमीवर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विद्यमान हेल्पलाइन क्रमांक 100, 101, 102, 108, 1033 आणि 1091 यांना 112 शी जोडण्यास सांगण्यात आले आहे. तसेच या क्रमांकाबाबत व्यापक जनजागृती करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.म्हणूनच आता आपत्कालीन परिस्थितीत गोंधळ न करता फक्त 112 हा नंबर लक्षात ठेवा. योग्य वेळी केलेला एक फोन जीव वाचवू शकतो.





