
आदिवासी भागातील महत्त्वाचा आर्थिक आधार ठरत असलेला करवंद रानमेवा सध्या धोक्यात आला असून त्याच्या संवर्धनाची गरज तीव्रतेने जाणवू लागली आहे. अकोले तालुक्यात करवंद मोठ्या प्रमाणात आढळतात, मात्र विकासाच्या नावाखाली होणारी झाडांची कत्तल आणि वारंवार लागणारे वणवे यामुळे या जाळ्यांचे नुकसान होत आहे.
उन्हाळ्यात आदिवासी बांधव पहाटेच डोंगर-दऱ्यात जाऊन करवंद गोळा करतात आणि राजूर, कोतूळ तसेच स्थानिक बाजारात विकून आपला उदरनिर्वाह करतात, पण व्यापाऱ्यांकडून त्यांना कवडीमोल भाव मिळत असल्याने त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे.
एकेकाळी शाळकरी मुले करवंद विकून शिक्षणाचा खर्च भागवत असत, परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे हे चित्रही कमी होत चालले आहे. करवंद हे केवळ चविष्ट नसून आयुर्वेदिकदृष्ट्या अत्यंत गुणकारी फळ आहे ते शरीराला थंडावा देणारे, पचन सुधारक, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आणि रक्ताल्पता कमी करण्यास मदत करणारे आहे. त्यामुळे करवंदाच्या झाडांचे संरक्षण, वणवे रोखणे आणि योग्य दर मिळवून देण्यासाठी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असून, यामुळे आदिवासींच्या आर्थिक स्रोताचे रक्षण होऊ शकते.





