
साखरपुड्याच्या नावाखाली बालविवाह करण्याचा प्रयत्न, पण पोलिस आणि सामाजिक संस्थांच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे दोन अल्पवयीन मुलींचे विवाह थांबवण्यात यश आले आहे. जिल्ह्यातील दाढ खुर्द आणि संगमनेर खुर्द येथे रविवारी गुप्त माहितीच्या आधारे स्नेहालयच्या उडान प्रकल्प आणि पोलिसांनी धाड टाकत ही कारवाई केली.
१७ वर्षे ११ महिने वयाच्या मुलींचे विवाह अनुक्रमे २६ आणि २४ वर्षांच्या तरुणांशी लावण्याची तयारी सुरू होती, मात्र पोलिसांच्या एंट्रीनंतर लग्नस्थळी एकच गोंधळ उडाला.
कुटुंबीयांनी हा केवळ साखरपुडा असल्याचे सांगून कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला, पण अल्पवयीन मुलीचा साखरपुडा देखील कायद्याने गुन्हा असल्याचे स्पष्ट करत सोहळा थांबवण्यात आला.
या कारवाईत स्थानिक प्रशासन, ग्रामसेवक आणि बाल संरक्षण समितीनेही सक्रिय सहभाग घेतला. विशेष म्हणजे, एप्रिल महिन्यातच अशा ३० बालविवाहांचे प्रयत्न उडान प्रकल्पाने रोखले असून, अक्षय्य तृतीयेच्या दिवशीच ५ विवाह थांबवण्यात आले होते, त्यामुळे जिल्ह्यात बालविवाहाविरोधात प्रशासन अधिक सतर्क झाल्याचे दिसत आहे.





