
मंदिरात दर्शन घेतल्यानंतर प्रसाद घरी आणणं ही आपली नेहमीची सवय असते. पण भारतात अशी काही मंदिरं आहेत, जिथे प्रसाद मंदिराबाहेर नेणं परंपरेनुसार योग्य मानलं जात नाही. चला जाणून घेऊया या अनोख्या मंदिरांबद्दल…
भारतातील अनेक मंदिरं त्यांच्या गूढ श्रद्धा आणि विशेष परंपरांसाठी प्रसिद्ध आहेत. आसाममधील कामाख्या मंदिरात काही प्रसाद मंदिराच्या आवारातच ग्रहण करण्याची प्रथा आहे. उज्जैनच्या कालभैरव मंदिरात देवाला अर्पण केलेलं मद्य आणि विशेष नैवेद्य बाहेर नेलं जात नाही.
राजस्थानमधील मेहंदीपूर बालाजी मंदिरात प्रसाद किंवा खाद्यपदार्थ घरी नेण्यास मनाई आहे. येथे नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळते, अशी श्रद्धा आहे. कर्नाटकातील कोटिलिंगेश्वर मंदिरात प्रसादावर चंडेश्वराचा प्रतीकात्मक अधिकार मानला जातो, त्यामुळे अनेक भक्त तो घरी नेत नाहीत.
तर गुजरातमधील महूडी जैन मंदिरातील सुखडी हा प्रसाद मंदिराच्या परिसरातच खावा लागतो. तो बाहेर नेणं अशुभ मानलं जातं.
या परंपरा श्रद्धा आणि स्थानिक मान्यतांवर आधारित आहेत. त्यामुळे दर्शनाला गेल्यावर त्या मंदिराचे नियम आणि परंपरा जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.





