
“रोहिणी नक्षत्र कोरडे गेले.. आता मृग नक्षत्रही संपत आले ; पण पाऊस मात्र गायबच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत असून, याचा फटका केवळ शेतीलाच नाही तर संपूर्ण अर्थचक्रालाही बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मंडळी, शेतकऱ्यांनी खरिपाच्या हंगामासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. शेताची मशागत झाली, बियाणे आणि खते खरेदी करून ठेवली, मात्र आभाळ कोरडेच असल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत.
यंदा मान्सून वेळेत दाखल झाल्याचे सांगितले गेले, पण प्रत्यक्षात बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. ८ जूनपासून सुरू झालेले मृग नक्षत्रही जवळपास कोरडेच गेले आहे. त्यामुळे बाजरी, मूग आणि सोयाबीनसारख्या खरिपातील महत्त्वाच्या पिकांच्या पेरण्या अडकून पडल्या आहेत.
आता सर्वांच्या नजरा २२ जूनपासून सुरू होणाऱ्या आर्द्रा नक्षत्राकडे लागल्यात. या नक्षत्रात चांगला पाऊस झाला तर पेरण्या होऊ शकतील. पण आर्द्राही कोरडे गेले तर मुगाची पेरणी अशक्य होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मंडळी, शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे पावसाचा प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. आता पुढील काही दिवसांत पाऊस पडतो की नाही, यावर ग्रामीण अर्थव्यवस्थेचे भवितव्य अवलंबून असणार आहे.





