
पोलिसांत तक्रार दिल्यावर लगेच कारवाई होईल, अशी अपेक्षा असते पण आता चित्र बदलणार आहे. कारण सरकारच्या नव्या निर्णयानुसार तक्रार अर्ज दिल्यानंतर कारवाईसाठी थेट सहा आठवडे वाट पाहावी लागणार आहे.
मंडळी, यापूर्वी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर १४ दिवसांत निर्णय घेतला जात होता. तक्रारीची पडताळणी करून गुन्हा दाखल करायचा की नाही, हे दोन आठवड्यांत ठरवले जायचे. पण आता शासनाच्या १८ मार्चच्या आदेशानुसार ही मुदत वाढवून थेट ६ आठवडे करण्यात आली आहे. तक्रारदाराने दिलेली माहिती आणि प्राथमिक पुरावे यांची सखोल पडताळणी करण्यासाठी पोलिसांना अधिक वेळ मिळावा, हा या निर्णयामागचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
पडताळणीत तक्रारीत तथ्य आढळल्यासच पुढे गुन्हा दाखल केला जाईल. त्यानंतर तपास अधिकारी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करतील आणि पुढे सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. मात्र या निर्णयामुळे एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे तक्रारदारांना न्याय मिळण्यात विलंब तर होणार नाही ना?
कारण आधी दोन आठवड्यांत होणारा निर्णय आता सहा आठवडे लागणार आहे. मंडळी, हा निर्णय एकीकडे सखोल चौकशीसाठी फायदेशीर ठरू शकतो पण दुसरीकडे सामान्य नागरिकांसाठी प्रतीक्षेची वेळ वाढवणारा ठरू शकतो. तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.





