
राहुरीच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अवघा महिना होत आला आहे पण आमदार अक्षय कर्डीले यांनी कामाचा अक्षरशः धडाका लावल्याचं चित्र सध्या राहुरी मतदारसंघात पाहायला मिळत आहे.
मंडळी, निवडणुकीनंतर अनेक नेते काही काळ शांत दिसतात पण अक्षय कर्डीले यांनी मात्र सुरुवातीपासूनच थेट जनतेमध्ये राहण्याचा मार्ग स्वीकारला आहे. त्यांच्या जनता दरबारात दिवसेंदिवस गर्दी वाढताना दिसत आहे. नागरिकांच्या समस्या ऐकून त्या तातडीने सोडवण्यावर त्यांनी भर दिला आहे.
अलीकडेच त्यांनी राहुरी आणि पाथर्डी तालुक्यातील विविध विकासकामांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला आणि आणखी काही नवीन विकासकामांचे नियोजन देखील केले. रस्ते, पाणी, मूलभूत सुविधा आणि भविष्यातील विकास यावर त्यांचा विशेष फोकस असल्याचं दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, त्यांचं विकासाचं व्हिजन मोठं असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कमी कालावधीत त्यांनी दाखवलेली कार्यपद्धती आणि जनतेशी ठेवलेला थेट संपर्क यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्येही त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण तयार झाल्याचं बोललं जात आहे.
दुसरीकडे सामान्य जनतेमधूनही समाधान व्यक्त केलं जात आहे. निवडून आल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात करणारा आमदार अशी त्यांची ओळख तयार होताना दिसत आहे. आता पुढील काळात अक्षय कर्डीले यांच्या माध्यमातून राहुरी-पाथर्डी मतदारसंघात कोणती मोठी विकासकामे मार्गी लागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





