
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे. आता नोंदणीकृत शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बियाणे मिळणार आहेत. मात्र त्यासाठी एक अट असणार आहे, आणि ती म्हणजे मातीचा नमुना सादर करावा लागणार आहे.
मंडळी, कडधान्य आत्मनिर्भरता अभियान आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत ही योजना राबवली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना माती परीक्षण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
कृषी विभागाच्या मते, माती परीक्षणामुळे जमिनीत कोणती अन्नद्रव्ये कमी आहेत आणि कोणती जास्त आहेत, याची अचूक माहिती मिळते. त्यामुळे पिकांना आवश्यक खतांचा योग्य वापर करता येतो आणि उत्पादन वाढण्यास मदत होते.
मातीचा नमुना कसा घ्यायचा, तर शेतातील चार ते पाच ठिकाणांहून ‘व्ही’ आकारात १५ ते २० सेंटीमीटर खोलीपर्यंत माती घ्यायची. ही माती एकत्र करून सावलीत वाळवायची आणि त्यातील साधारण अर्धा किलो माती स्वच्छ पिशवीत भरून नमुना म्हणून सादर करायची.
या प्रक्रियेसाठी शेतकरी कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा मृदा परीक्षण प्रयोगशाळेची मदत घेऊ शकतात.
मात्र लक्षात ठेवा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी रीतसर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांना मोफत सोयाबीन बियाणे हवे आहेत, त्यांनी वेळेत माती परीक्षण करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.





