
अहिल्यानगरकरांनो, पावसाने आणखी दडी मारली तर शहरासमोर मोठे पाणी संकट उभे राहू शकते. कारण नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणातील पाणीसाठा आता चिंताजनक पातळीवर पोहोचलाय.
मंडळी, जलसंपदा विभागाने महापालिकेला पाण्याचा अत्यंत जपून वापर करण्याच्या सूचना दिल्यात. सध्या मुळा धरणात ३१ ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच पिण्याच्या पाण्याचा साठा शिल्लक आहे.
सध्या महापालिका दररोज मुळा धरणातून सुमारे १०० एमएलडी पाणी उपसा करते. यापैकी काही पाणी आसपासच्या गावांना पुरवले जाते, तर उर्वरित पाणी नगर शहराच्या वापरासाठी दिले जाते.
शहरातील बहुतांश भागांमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे, तर काही भागांत तीन ते चार दिवसांतून एकदाच पाणी मिळत आहे. ज्या भागांमध्ये नळजोडणी नाही, तिथे १० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
सर्वात चिंतेची बाब म्हणजे १५ जून रोजी मुळा धरणातील उपयुक्त पाणीसाठा केवळ ९.७८ टक्के इतका नोंदवला गेला आहे.
यामुळे जलसंपदा विभागाने महापालिका प्रशासनासह नागरिकांनाही पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
मंडळी, सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी पावसाने आणखी उशीर केला तर नगरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो असे चित्र आहे.





