
पारनेर तालुक्यातील ढोकी गावातील एका धक्कादायक प्रकरणाने खळबळ उडाली आहे. संतोष नर्हे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईने गंभीर आरोप करत पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे. तक्रारीनुसार, संतोष यांच्या पत्नीचे गावातील एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते.
हे संबंध टिकवण्यासाठी आणि 10 एकर शेतजमीन मिळवण्यासाठी संतोष यांना सतत मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता, असा आरोप करण्यात आला आहे.
20 जून रोजी वादानंतर त्यांना विषारी औषध पाजल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, पत्नी रुग्णालयातून निघून गेली आणि अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहिली नसल्याचा आरोप आहे.
सध्या पत्नी आणि तिचा कथित प्रियकर फरार असून, त्यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. मात्र, संतोष यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाला असल्याचा दावा कुटुंबीयांनी करत खुनाचा गुन्हा दाखल करून स्वतंत्र तपासाची मागणी केली आहे.





