
अहिल्यानगरमध्ये वाढत्या उष्णतेमुळे मोठा निर्णय घेण्यात आलाय. आता शाळांची वेळ पूर्णपणे बदलली आहे. मंडळी, जिल्ह्यात उष्मालाटेचा इशारा देण्यात आला असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आज म्हणजेच १८ एप्रिलपासून उन्हाळी सुट्टीपर्यंत जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा सकाळी ७ ते ११ या वेळेत भरतील.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी हा आदेश दिला असून, वाढत्या तापमानामुळे मुलांना होणारा त्रास टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे, म्हणजेच उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सर्व शाळांनी व्यवस्थापन समितीची मंजुरी घेऊन तात्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, एकीकडे उष्णतेचा इशारा असतानाच हवामान विभागाने आणखी एक अपडेट दिली आहे. १९, २० आणि २१ एप्रिल या तीन दिवसांमध्ये काही ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच पुढील काही दिवस हवामानात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





