
अहिल्यानगरमध्ये वाढत्या तापमानामुळे नागरिकांसाठी मोठा दिलासा मिळालाय. जिल्हा रुग्णालयात उष्माघातासाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आलाय.या कक्षात कूलिंग बेड, एअर कूलर, पंखे आणि तातडीच्या उपचारांसाठी आवश्यक औषधसाठा उपलब्ध आहे.
प्रशिक्षित डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि २४ तास आपत्कालीन सेवा सज्ज आहे. गंभीर रुग्णांसाठी ICU सुविधाही तयार ठेवण्यात आली आहे.डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, योग्य वेळी उपचार मिळाल्यास उष्माघातावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता जागरूक राहणे गरजेचे आहे. आता उष्माघाताची लक्षणे काय आहेत, हेही जाणून घेणे महत्वाचे आहे.
शरीराचे तापमान अचानक वाढणे, चक्कर येणे, डोके दुखणे, उलट्या होणे आणि अशक्तपणा जाणवणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. तसेच काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. शक्यतो दुपारच्या वेळेत घराबाहेर पडू नये.
बाहेर पडताना डोक्यावर टोपी, स्कार्फ किंवा छत्रीचा वापर करावा. भरपूर पाणी, ताक आणि लिंबूपाणी यांसारखे द्रवपदार्थ नियमित घेत राहावेत. मंडळी, उन्हाळा अजून वाढणार आहे , त्यामुळे स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.





