
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील सनस्ट्रीम ग्रीन इनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालक व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा गंभीर प्रकार 27 एप्रिल रोजी घडला. कंपनीचे संचालक करण दीपक भद्रा (रा. घाटकोपर, मुंबई) यांनी याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
या फिर्यादीवरुन पोलिसानी पोपट गजानन कोकाटे, ओंकार पोपट कोकाटे व अंबादास गजानन कोकाटे (तिघेही रा. चिचोंडी पाटील) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भद्रा यांच्या कंपनीचे चिचोंडी पाटील येथे सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरु आहे.
वरील तिन्ही आरोपींनी 27 एप्रिलला या प्रकल्पाच्या कामावर जावून तेथील कर्मचारी व संचालक भद्रा यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांनी कंपनीचे काम सुरु ठेवायचे असेल तर दोन कोटी रुपये द्या, असा दम दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणही, याच कारणातून घडले होते. आता नगर जिल्ह्यातही खंडणी मागण्याचे लोण पसरल्याने एकच खळबळ उडाली आहे.





