
अकोले तालुक्यातून अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे, कळस येथील 45 वर्षीय शेतकरी दिगंबर जनार्दन वाकचौरे यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असून हा या हंगामातील पहिला बळी ठरला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अकोले आणि संगमनेर परिसरात तापमान 41 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून तीव्र उन्हामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दिगंबर वाकचौरे हे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी कळसहून मोटारसायकलवर संगमनेर येथे गेले होते, मात्र भरउन्हात प्रवास करत असताना त्यांना उष्माघाताचा त्रास झाला. पानसरे हॉस्पिटलजवळ त्यांनी पाणी घेतले, पण अचानक चक्कर येऊन ते जागीच कोसळले आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन करण्यात आले असून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





