
उन्हाळा वाढताच अनेक विषारी साप गरमीमुळे बिळातून बाहेर पडतात आणि थंड, सावलीच्या जागेच्या शोधात घराच्या आसपास येतात. त्यामुळे घराचे कोपरे, स्टोअर रूम, सामानाखालील जागा, तसेच वाळलेल्या पालापाचोळ्याचे ढिगारे ही त्यांची लपण्याची मुख्य ठिकाणे बनतात. अनेकदा आपण दुर्लक्ष करून या ठिकाणी जातो आणि तिथेच धोका वाढतो.
कडक उन्हाळा आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला साप अधिक सक्रिय आणि आक्रमक होतात, त्यामुळे विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषतः मुलांनी पालापाचोळ्याजवळ किंवा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात खेळणे टाळावे, कारण अशा ठिकाणी साप दबा धरून बसलेले असू शकतात.
महाराष्ट्रात आढळणाऱ्या वायपर आणि कोब्रा या प्रमुख सापांच्या विषाचा परिणाम वेगळा असतो, त्यात कोब्राचे विष अतिशय वेगाने परिणाम करते आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे, अंधाऱ्या कोपऱ्यांपासून सावध राहणे आणि सतर्कता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे, कारण एक छोटी चूक मोठा धोका ठरू शकते.





