
आपले सरकार’ सेवा केंद्रांवर होणारी अवाजवी लूट आता थांबणार आहे, कारण राज्य सरकारने एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. मंडळी, अनेक ठिकाणी सेवा केंद्रांवर नागरिकांकडून ठरलेल्या दरापेक्षा जास्त पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. याची गंभीर दखल घेत आता प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.
आता प्रत्येक ‘आपले सरकार’ सेवा केंद्राच्या बाहेर स्पष्ट दरफलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. म्हणजे कोणत्या प्रमाणपत्रासाठी किती शुल्क आहे, हे नागरिकांना थेट दिसणार आहे. इतकंच नाही, तर प्रत्येक केंद्रावर तक्रार नोंदवण्यासाठी क्यूआर कोड लावणेही अनिवार्य करण्यात आले आहे.
जर केंद्रचालक जास्त पैसे मागत असेल, तर नागरिक थेट मोबाईलवरून क्यूआर कोड स्कॅन करून तक्रार करू शकतात. त्यामुळे आता तक्रार करण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज उरणार नाही.
आणि एक महत्वाची बाब म्हणजे, जर एखाद्या सेवा केंद्राला ५ टक्क्यांपेक्षा जास्त नकारात्मक अभिप्राय मिळाला, तर त्या केंद्राची थेट चौकशी केली जाणार आहे. म्हणजेच आता ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांमध्ये पारदर्शकता वाढणार असून, नागरिकांची फसवणूक थांबण्याची शक्यता आहे.





