
पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. मंडळी, केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी वार्षिक ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली आहे. यासाठी ३० जून ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
या तारखेपर्यंत ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते. अहिल्यानगर जिल्ह्यातील आकडेवारी पाहिली तर एकूण ५ लाख ६९ हजार ४७५ शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत. त्यापैकी ५ लाख ६० हजार ८२ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. मात्र अजूनही ९ हजार ३९३ शेतकऱ्यांची केवायसी बाकी आहे.
शासनाने ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शेतकरी सीएससी सेंटर, तलाठी कार्यालय किंवा बँकेत जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी करू शकतात. तसेच घरबसल्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येते.
त्यासाठी पीएम किसान किंवा उमंग अॅप डाउनलोड करायचे, आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून ओटीपीद्वारे लॉगिन करायचे आणि फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून स्वतःचा चेहरा स्कॅन करून ई-केवायसी पूर्ण करता येते.





