
अहिल्यानगर जिल्ह्यातील रेशन लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रास्त भाव दुकानांमधून मिळणाऱ्या धान्याची गुणवत्ता आणि साठवणुकीची पद्धत आता अन्न व औषध प्रशासनाकडून तपासली जाणार आहे. रेशनच्या धान्यात खडे, दगड, किडे, आळ्या, जाळे किंवा उंदरांच्या लेंड्या आढळल्याच्या तक्रारी यापूर्वी समोर आल्या आहेत.
अनेकदा धान्य कोंदट आणि अस्वच्छ ठिकाणी साठवल्यामुळे ते खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे तपासणीदरम्यान धान्याची गुणवत्ता, स्वच्छता आणि साठवणूक व्यवस्था यासह विविध बाबी तपासल्या जाणार आहेत.
विशेष म्हणजे रेशन दुकानदारांसाठी एफएसएसआय परवान्याचा नियम आधीपासूनच आहे. आता त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी गौरव जगताप यांच्या माहितीनुसार, तपासणीत धान्याचे नमुने असुरक्षित आढळल्यास संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची कारवाई होऊ शकते. त्यामुळे रेशन दुकानदारांनी धान्याची योग्य पद्धतीने आणि स्वच्छ वातावरणात साठवणूक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





