
पावसाने दडी मारल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. अनेक भागांत खरीप पिके पाण्याअभावी सुकू लागली, तर विहिरी आणि तलावांच्या पाणीपातळीतही घट झाली आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने दिलासा देणारा अंदाज जाहीर केला आहे.
१८ ते २२ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाची शक्यता आहे. १८ सप्टेंबरला हलका पाऊस, तर १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
या काळात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. २२ सप्टेंबरलाही हलका किंवा विजांसह पाऊस होऊ शकतो.
मात्र हा पाऊस संपूर्ण जिल्ह्यात समान प्रमाणात होईलच, असे निश्चित नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. १७ सप्टेंबरला अहिल्यानगर निरीक्षण केंद्रावर केवळ ०.१ मिमी पावसाची नोंद झाली होती.





