
सप्टेंबरचे १५ दिवस उलटूनही राज्यातील अनेक भागांत पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत.
सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांपासून ५०० मीटरच्या परिसरात पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी विहीर खोदण्यास परवानगी न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच, सार्वजनिक जलस्रोतांवर परिणाम होत असल्यास जवळच्या विहिरींमधून भूजल उपशावर तात्पुरती बंदी घालता येणार आहे. एक किलोमीटर परिसरातील भूजल उपशावरही निर्बंध आणण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत.
लातूरमध्ये कमी पावसामुळे टंचाईची शक्यता वाढली असून, मांजरा धरणाच्या पाइपलाइनमधील पाणीचोरी आणि गळती रोखण्यासाठी लातूर, बीड आणि धाराशिवचा संयुक्त गट तयार केला जाणार आहे.
खरीप पिकांचे नुकसान पाहता पीक कापणी प्रयोग अचूक ठेवण्याचे, पशुधनासाठी चाऱ्याचे नियोजन करण्याचेही निर्देश आहेत. टँकरची गरज भासल्यास त्यावर जीपीएस बंधनकारक करण्याची सूचना करण्यात आली आहे.





