
अहिल्यानगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.. हळदीच्या कार्यक्रमात अचानक गोंधळ झाला आणि हा वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला.. दगड आणि धारदार शस्त्राने हल्ला झाल्याने एक महिला जखमी झाली आहे.
मंडळी, ही घटना नागापूर परिसरात घडली. हळदीच्या कार्यक्रमासाठी कुटुंबीय आणि नातेवाईक एकत्र आले होते. वातावरण आनंदाचं होतं, पण रात्रीच्या वेळी ध्वनिक्षेपकावर गाणी सुरू असताना काही जणांमध्ये वाद झाला.
हा वाद काही वेळातच चिघळला आणि त्याचं रूपांतर थेट हाणामारीत झालं. संग्राम कदम, किरण उर्फ डॉरिमॉन साळवे आणि बंटी शिंदे या संशयितांनी एकत्र येत शिवीगाळ करत दगड आणि धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात जयश्री भाकरे या महिलेला दुखापत झाली. एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही.. काही वेळाने सम्राटनगर परिसरातही पुन्हा गोंधळ घालण्यात आला. शिवीगाळ, दमदाटी करत वाहन आणि घराच्या दरवाज्याची तोडफोड करण्यात आल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी फिर्यादी ब्रिजेश सूर्यनारायण यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.





