
मंडळी, अहिल्यानगरमध्ये घडलेल्या गोळीबार प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे. सुरुवातीला हा प्रकार जीवघेणा हल्ला असल्याचं समोर आलं होतं. पण पोलिस तपासात धक्कादायक सत्य उघड झालंय, या प्रकरणात फिर्यादीनेच स्वतःवर हल्ला घडवून आणल्याचा बनाव रचला होता !
२४ मे २०२६ रोजी चिरंजीव दत्तात्रय गाढवे हे पाइपलाइन रोडवरील पुणेरी अमृततुल्य येथे चहा पित असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला करून हवेत गोळीबार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र तोफखाना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
तपासादरम्यान दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर मुख्य आरोपी ऋतिक आनंद हरिहर याला अटक करण्यात आली. पोलिस चौकशीत ऋतिकने धक्कादायक कबुली दिली.
हा संपूर्ण हल्ला चिरंजीव गाढवे यांनीच सुपारी देऊन घडवून आणल्याचं समोर आलं. आरोपीकडून गावठी पिस्तूलही जप्त करण्यात आलं आहे. या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.





