
राज्यातील महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता पर्यटन क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना तब्बल १५ लाख रुपयांपर्यंतचं बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. मंडळी, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने ‘आई’ म्हणजेच ‘आदिशक्ती महिला सन्मान’ ही योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रात नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या किंवा आधीपासून व्यवसाय करणाऱ्या महिलांना १५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा दिला जाणार आहे. म्हणजेच, कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्यास हे कर्ज महिलांसाठी बिनव्याजी ठरणार आहे.
या योजनेत पर्यटन क्षेत्राशी संबंधित तब्बल ४१ प्रकारचे व्यवसाय आणि उद्योगांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे होमस्टे, रिसॉर्ट, ट्रॅव्हल सर्व्हिस, फूड व्यवसाय, पर्यटन मार्गदर्शन अशा अनेक क्षेत्रांमध्ये महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची मोठी संधी मिळणार आहे.
मात्र, या योजनेसाठी काही अटीही आहेत. संबंधित पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असावा, व्यवसाय महिलेच्या मालकीचा आणि तिच्याच व्यवस्थापनाखाली असावा, तसेच व्यवसायातील किमान ५० टक्के कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे.
मंडळी, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या महिलांसाठी ही योजना मोठी संधी ठरू शकते.





