
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक अतिशय मोठा निर्णय घेतलाय. आता शेतीची कामे, विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती, गाळ आणि मुरुमावर कोणतीही रॉयल्टी भरावी लागणार नाही. मंडळी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात ही मोठी घोषणा केली आहे.
या निर्णयानुसार, शेतकरी स्वतःच्या शेतीच्या सुधारणेसाठी, विहीर खोदण्यासाठी, जनावरांचा गोठा बांधण्यासाठी, शेतघर उभारण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी स्वतःच्या शेतातील माती, गाळ आणि मुरूम वापरू शकणार आहेत. यासाठी कोणतीही रॉयल्टी आकारली जाणार नाही.
इतकंच नाही, तर जलकुंभ, शेततळी, गावतळी, पाझर तलाव, गाव नाले, महसुली नाले आणि इतर जलसंधारण कामांमधील गाळही नियमानुसार शेतीसाठी वापरता येणार आहे.
यामध्ये आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे, शेतकरी स्वतःच्या वापरासाठी माती किंवा मुरूम ट्रॅक्टर, ट्रक किंवा बैलगाडीतून नेत असेल, तर पोलिस किंवा महसूल विभाग त्याची गाडी अडवून दंडात्मक कारवाई करू शकणार नाहीत.
आणि एखाद्या अधिकाऱ्याने शेतकऱ्याला नाहक त्रास दिला, तर त्या अधिकाऱ्यावरच कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही महसूल मंत्र्यांनी दिला आहे. मंडळी, सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून शेतीची कामेही आता कमी खर्चात करता येणार आहेत.





