
अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीये. कर्जतमधील एका हॉटेलमध्ये वेटरचा निर्घृण खून करण्यात आला असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
मंडळी, कर्जत शहरातील एका हॉटेलमध्ये पहाटे चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान ही थरारक घटना घडली. समीर अकबर शेख असे मृत युवकाचे नाव असून तो जामगाव येथील रहिवासी होता. तो हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता.
प्राथमिक माहितीनुसार, हॉटेलमध्ये कामाच्या कारणावरून वाद झाला आणि त्यानंतर समीरवर तिघांनी हल्ला केला. आरोपींनी त्याचे डोके लोखंडी कॉटवर जोरात आपटले. इतकंच नाही, तर काळ्या रंगाच्या कपड्याने गळा आवळून त्याचा खून करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
या प्रकरणातील तिन्ही आरोपी हे परप्रांतीय असल्याची माहिती समोर आली आहे. घटना घडल्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दौंड रेल्वे स्टेशन येथे सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.अधिक तपास आता पोलीस करत आहेत.





