
खुर्च्या मोजक्या… पण दावेदार शेकडो ! महायुतीतील कार्यकर्त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची आता लगबग सुरू झाली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल ३५ शासकीय समित्यांवर लवकरच कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या होण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन वर्षांपासून सत्तेतील पदांची वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना यामुळे मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र, महत्त्वाच्या समित्यांवर वर्णी लावण्यासाठी महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
नियुक्त्यांसाठी ६०-२०-२० असा फॉर्म्युला ठरल्याचे सांगितले जात आहे. ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार आहे, त्या पक्षाला ६० टक्के, तर उर्वरित दोन पक्षांना प्रत्येकी २० टक्के पदे मिळण्याची शक्यता आहे.
अहिल्यानगर शहर, अकोले, कोपरगाव आणि पारनेरमध्ये राष्ट्रवादीला, तर पाथर्डी, राहुरी, राहाता आणि श्रीगोंद्यात भाजपला ६० टक्के वाटा मिळू शकतो. संगमनेर आणि नेवाशात शिंदेसेनेचा प्रभाव राहणार आहे.
दरम्यान, ७०० विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदांच्या नियुक्त्याही अद्याप रखडल्या आहेत. त्यामुळे आता कार्यकर्त्यांना पद मिळणार की पुन्हा प्रतीक्षाच करावी लागणार, याकडे लक्ष लागले आहे.





