
अयोध्येतील श्रीराम मंदिर ट्रस्टमध्ये मोठी जबाबदारी आता अहिल्यानगरच्या भूमिपुत्राकडे आली आहे. श्रीरामपूरचे स्वामी गोविंददेवगिरी यांची ट्रस्टच्या महासचिवपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
अयोध्येत झालेल्या ट्रस्टच्या बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली. यापूर्वी कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या स्वामी गोविंददेवगिरी यांच्यावर आता महासचिवपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
याच बैठकीत महेश भागचंद यांची कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच मदन मोहन पांडे आणि निर्मला यादव यांची विश्वस्त म्हणून निवड झाली. माजी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची ट्रस्टचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
स्वामी गोविंददेवगिरी यांच्या निवडीची बातमी समोर येताच श्रीरामपूरसह अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भूमिपुत्राला मिळालेल्या या सन्मानामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.





