
अखेर पावसाने साथ दिली आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधानाचे हास्य फुलले. संगमनेर आणि अकोले परिसरातून दिलासादायक बातमी समोर आली आहे. सलग तीन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले आहे.
धरणातून डाव्या कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून, याचा मोठा फायदा संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. कालव्यातून पाणी सोडल्यामुळे परिसरातील बंधारे भरतील, भूजल पातळी वाढेल आणि विहिरी तसेच बोअरवेलमध्येही पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा आधार मिळणार आहे.
दरम्यान, अकोले तालुक्यातील आढळा धरणही पूर्ण क्षमतेने भरले असून, त्याच्या सांडव्यावरून पाणी नदीपात्रात वाहू लागले आहे. मात्र प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कालवा आणि नदीकाठाजवळ अनावश्यक गर्दी करू नये तसेच लहान मुले आणि जनावरे पाण्याजवळ जाऊ देऊ नयेत, असेही सांगण्यात आले आहे.





