
अवघ्या दोन महिन्यांत आई आणि वडील दोघांनाही गमावण्याचे दुःख… आणि आता दोन निष्पाप चिमुकल्यांच्या आयुष्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव येथे ही हृदयद्रावक घटना घडली.
१९ मे रोजी माणिकदौंडीजवळ झालेल्या कार अपघातात कालिदास सहदेव बनकर (वय ३२) यांचा मृत्यू झाला. कुटुंब या धक्क्यातून सावरत असतानाच १६ जुलै रोजी पत्नी सरोजनी कालिदास बनकर (वय २८) यांना घराजवळ कचरा गोळा करताना सर्पदंश झाला.
उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी दाम्पत्यामागे सहा वर्षांची आरोही आणि एक वर्षाचा आरव ही दोन लहान मुले आहेत. आता त्यांचा सांभाळ ७० वर्षीय आजोबा आणि ६५ वर्षीय आजी करत आहेत.
एका अपघाताने व त्यानंतरच्या एका सर्पदंशाने संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलून गेले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.





