
अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने आता चांगलाच जोर धरलाय. अनेक धरणांमध्ये पाण्याची आवक वेगाने सुरू झाली असून शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. सर्वात आधी भंडारदरा धरणाबद्दल बोलायचं झालं, तर काल सायंकाळपर्यंत धरणात ३ हजार ६०८ दलघफूट पाणीसाठा झाला होता.
गेल्या चोवीस तासांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली असून पावसाचा जोर कायम राहिल्यास हा साठा चार हजार दलघफुटांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. वाकी तलावही ५१ टक्क्यांपेक्षा अधिक भरला आहे.
निळवंडे धरणात अजून आवक मर्यादित असली तरी पाणीसाठा हळूहळू वाढत आहे. आढळा धरणातही पाण्याची भर पडत आहे.
मुळा धरणाच्या पाणलोटातही गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे. त्यामुळे मुळा धरणातील पाणीसाठा ६ हजार ३५६ दलघफूट, म्हणजेच जवळपास २४.४४ टक्क्यांवर पोहोचला आहे.
कुकडी समूह धरणांमध्येही गेल्या चोवीस तासांत ४०७ दलघफूट नवीन पाण्याची आवक झाली आहे. सध्या या समूह धरणांमध्ये एकूण ११ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
डिंभे, येडगाव, वडज, माणिकडोह आणि इतर धरणांमध्येही पाणी वाढू लागले आहे. पुढील काही दिवस असाच पाऊस कायम राहिला, तर जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्यासह शेतीसाठीही मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.





