
अहिल्यानगरसह राज्यातील अनेक नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आता काही भागांमध्ये सातबारा उतारा इतिहासजमा होणार असून त्याऐवजी नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे. मंडळी, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या हद्दवाढीमुळे अनेक गावे आता शहरी क्षेत्रात समाविष्ट झाली आहेत. या भागांमध्ये पूर्वी शेतीच्या जमिनींसाठी सातबारा उतारा वापरला जात होता.
मात्र आता या जमिनी शहरी आणि अकृषिक स्वरूपाच्या झाल्यामुळे शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या वाढीव क्षेत्रातील जमिनींचे सातबारे बंद करून त्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे. यासाठी नगर भूमापन अर्थात सिटी सर्व्हेची विशेष योजना राबवली जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्येक मालमत्तेची अचूक मोजणी करून नवीन नकाशे तयार केले जातील.
या प्रॉपर्टी कार्डवर मालमत्तेचे अचूक क्षेत्रफळ, चारही सीमा, मालकाचे नाव, नगर भूमापन क्रमांक आणि त्या मालमत्तेवर कोणते कर्ज किंवा बोजा आहे याची संपूर्ण माहिती नमूद असेल.
हेच कार्ड भविष्यात मालकी हक्काचा अधिकृत आणि अंतिम पुरावा मानले जाणार आहे. या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मालमत्तेची खरेदी-विक्री, वारस नोंद आणि हस्तांतरण प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहे.





