
अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीत जे होईल, असं आम्ही सांगत होतो अगदी तसंच झालं. उमेदवारी माघार घेण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. आज तिन्हीही अपक्षांनी माघार घेतली. अपेक्षेप्रमाणे भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे हे या जागेवर बिनविरोध निवडून आले. महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसला गेल्याचे सुरुवातीला सांगितले होते. परंतु काँग्रेसकडून कुणीही अधिकृत उमेदवाराने अर्ज भरला नाही.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडूनही राणी लंके यांचं नाव चर्चेत आणलं गेलं. त्या अर्ज भरतील, असंही सांगितलं गेलं. पण यापैकी काहीच झालं नाही. महाविकास आघाडीकडून कुणीच अर्ज भरला नाही. अखेरपर्यंत भाजपकडून प्राजक्त तनपुरे, अपक्ष म्हणून श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे, अपक्ष म्हणून श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दत्तात्रय पानसरे, अपक्ष म्हणून कमलेश गांधी, आणि अपक्ष म्हणून मच्छिंद्र धुमाळ यांचेच अर्ज शिल्लक राहिले. त्यातील मच्छिंद्र धुमाळ, कमलेश गांधी यांनी गुरुवारी दुपारपर्यंत आपले अर्ज मागे घेतले.
त्यानंतर काही वेळासाठी करण ससाणे हे नाँट रिचेबल झाले. त्यामुळे भाजपचं टेन्शन वाढलं. परंतु अचानक समोर येत त्यांनीही आपला अर्ज मागे घेतला. त्यानंतर तनपुरे विरोधात एकमेव अर्ज शिल्लक असलेल्या दत्तात्रय पानसरे यांनीची मनधरणी करण्यात महायुतीला यश आलं.
अगदी शेवटच्या काही मिनिटांत त्यांनीही अर्ज मागे घेतला. त्यामुळे नुकतेच भाजपमय झालेले प्राजक्त तनपुरे, हे आता जिल्ह्यातील १८ वे आमदार झाले आहेत.





