
तापमान कमी झालंय पण उकाडा मात्र अजूनही जीव घेण्यासाठी तयार आहे. मंडळी, अहिल्यानगरमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या तीव्र उन्हाळ्यानंतर तापमान ३८ अंशांवर आले आहे. पण नागरिकांना अजूनही दिलासा मिळालेला नाही. कारण हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाडा अधिकच असह्य झाला आहे. एप्रिलमध्ये शहराचा पारा ४२ ते ४३ अंशांपर्यंत पोहोचला होता.
आता तापमान कमी असले, तरी ढगाळ वातावरण आणि दमट हवा यामुळे शरीराला ४० अंशांपेक्षा जास्त उष्णता जाणवत आहे. दिवसभर घामाच्या धारा आणि चिकट वातावरणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, हवामान विभागाने पुढील २ ते ३ दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शास्त्रज्ञ रवी आंधळे यांनी शेतकऱ्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
काढणी झालेला माल सुरक्षित ठिकाणी हलवावा आणि फळबागांतील पिकलेली फळे तातडीने काढून घ्यावीत, असे त्यांनी सांगितले. नक्कीचं नगरकरांना पुढील काही दिवस उकाडा आणि पावसाचा दुहेरी सामना करण्यासाठी तयार राहावे लागणार आहे.





