
मंडळी, राम कृष्ण हरी ! आषाढी वारी जवळ येतेय आणि याच निमित्ताने आज आपण अहिल्यानगरच्या बेलापूर गावचा एक थक्क करणारा इतिहास पाहणार आहोत.
मंडळी, येत्या २९ जूनला त्र्यंबकेश्वरहून निघालेली संत निवृत्तीनाथांची पालखी ९ जुलैला बेलापूरला मुक्कामी येत आहे. यासाठी प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
पण बेलापूर गाव आणि या पालखीचं नातं खूप जुनं आणि ऐतिहासिक आहे. असं म्हटलं जातं की, बेलापूरचे भानुदास महाराज हिरवे यांना संत निवृत्तीनाथांनी स्वप्नात दृष्टांत दिला होता, ज्यानंतर त्यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये समाधीचा शोध घेतला.
त्यानंतर वारीचा मार्ग कसा ठरवायचा, असा प्रश्न जेव्हा पडला, तेव्हा हिरवे महाराजांच्या ‘लाडक्या’ नावाच्या घोड्याने हा मार्ग निश्चित केला.
हा घोडा जिथे थांबायचा तिथे दुपारची विश्रांती आणि जिथे बसायचा तिथे पालखीचा मुक्काम ठरवला जायचा, पुढे याच घोड्याचा मृत्यू बेलापुरात झाला आणि आज त्याची समाधी भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. तर मग मंडळी वारीची ही अनोखी माहिती कशी वाटली, कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.





