
अहिल्यानगर जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. नेवासा तालुक्यातील पाचुंदा परिसरात सख्ख्या भाऊ-बहिणीचा शेततळ्यात बुडून मृत्यू झालाय. मंडळी, स्वाती रामदास खरात वय 16 वर्षे आणि तिचा भाऊ किरण रामदास खरात वय 15 वर्षे हे दोघे शेततळ्याजवळ पेरू खाण्यासाठी गेले होते.
मात्र काही क्षणांतच आनंदाचे हे क्षण काळाने हिरावून घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, स्वातीचा अचानक पाय घसरला आणि ती शेततळ्यात पडली. बहिणीला पाण्यात पडलेले पाहताच किरणने तिचा जीव वाचवण्यासाठी क्षणाचाही विचार न करता तळ्यात उडी घेतली. पण दुर्दैवाने दोघांनाही पोहता येत नव्हते. त्यामुळे पाण्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि दोघांनाही वाचवता आले नाही.
स्वाती आणि किरण हे दोघेही शिक्षण घेत होते. एका क्षणात दोन लेकरं गमावल्याने कुटुंबावर आणि गावावर दुःखाचे सावट पसरले आहे. बहिणीला वाचवण्यासाठी भावाने घेतलेली उडी त्याच्या प्रेमाची साक्ष देऊन गेली, पण नियतीने दोघांनाही हिरावून नेले.





