
अहिल्यानगरमधून मोठी ब्रेकिंग बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात तब्बल ४६ कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाने मोठी कारवाई केली असून त्यांच्या परवान्यांवर निलंबन आणि रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
मंडळी, खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके योग्य दरात मिळावीत, यासाठी कृषी विभागाने जिल्हाभर विशेष तपासणी मोहीम राबवली. या तपासणीत अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये गंभीर अनियमितता आणि नियमबाह्य प्रकार आढळून आले.
यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी संबंधित केंद्र चालकांची सुनावणी घेतली आणि थेट २४ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित केले.
यामध्ये अकोले तालुक्यातील २, शेवगावमधील ८, संगमनेरमधील ३, नेवासा येथील १, कर्जतमधील ३, कोपरगावमधील ३ आणि नगर तालुक्यातील ४ कृषी सेवा केंद्रांचा समावेश आहे.
याशिवाय अहिल्यानगर तालुक्यातील २१ आणि श्रीरामपूरमधील १ असे एकूण २२ कृषी सेवा केंद्र कायमस्वरूपी बंद आढळले. शेतकऱ्यांना गरज असताना ही केंद्रे सुरू नसल्यामुळे त्यांच्या रासायनिक खत विक्रीचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.
तपासणीदरम्यान खत साठ्यातील तफावत, ई-पॉस यंत्रावरील नोंदी आणि प्रत्यक्ष गोदामातील साठा यामध्ये फरक आल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.





