
शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र शासनाने ‘कापूस उत्पादकता अभियान’, म्हणजेच ‘कपास क्रांती’ अभियान सुरू करण्याची घोषणा केली आहे. येत्या पाच वर्षांत कापूस उत्पादन वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत. मंडळी, २०२६-२७ ते २०३०-३१ या कालावधीत हे अभियान राबवले आहे.
या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या कापूस लागवड प्रात्यक्षिकांसाठी आर्थिक मदत मिळणार आहे. क्लोज स्पेसिंग प्रात्यक्षिकासाठी प्रति हेक्टर १३ हजार ५०० रुपये, सघन कापूस लागवडीसाठी प्रति हेक्टर १८ हजार रुपये, तर एकात्मिक पीक व्यवस्थापनासाठी प्रति हेक्टर ७ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक प्रात्यक्षिकासाठी शेती दिन आयोजित करण्यासाठी ५०० रुपयांची अतिरिक्त मदत दिली जाणार आहे.
या योजनेचा लाभ शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांना घेता येणार आहे. अर्ज महाडीबीटी पोर्टलवर करावा लागणार असून निवड ‘प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर होणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळेत अर्ज करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेय.





