
उक्कलगावमध्ये २७ वर्षीय आशिष उर्फ लाल्या विजय पारखे याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आशिष हा उक्कलगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य विजय रत्नाकर पारखे यांचा धाकटा मुलगा होता. गेल्या दोन महिन्यांपासून तो कोपरगाव येथील सासुरवाडीत राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
काल रात्री आशिषचा मृतदेह घराच्या पडवीत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. त्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार झाल्याचे प्राथमिक माहितीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणात दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
आशिषच्या वडिलांनी जवळच्या व्यक्तींवर संशय व्यक्त करत, त्याला मारहाण करून मृतदेह पडवीत आणून टाकल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.





