
नगरकरांनो.. तुम्ही जे तूप खात आहात ते खरंच शुद्ध आहे का? की नकळत विषच खात आहात? अहिल्यानगरमधून समोर आलेल्या एका कारवाईने सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. मंडळी, अन्न व औषध प्रशासनाने सावेडी उपनगरातील एकवीरा चौक परिसरात छापा टाकत तब्बल १६९ लिटर भेसळयुक्त तूप जप्त केले आहे.
हे तूप गुजरातमधील एका कंपनीचे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, जिल्ह्यात भेसळयुक्त तुपाची विक्री करणारे मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, चुकीचे दावे करणारे उत्पादक आणि भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिलाय.
दरम्यान, राज्यभर सुरू असलेल्या तपासणीतही धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. दुधामध्ये पाणी, युरिया, डिटर्जंट, कॉस्टिक सोडा, स्टार्च, हायड्रोजन पेरॉक्साइड आणि फॉर्मालिनसारख्या घातक रसायनांची भेसळ करून कृत्रिम दूध तयार केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
यामुळेच ‘स्वच्छ दूध, सुरक्षित आरोग्य, भेसळमुक्त महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत राज्यभर विशेष कारवाई सुरू आहे. मंडळी, अन्नपदार्थ खरेदी करताना त्याची गुणवत्ता, पॅकिंग आणि विश्वासार्हता तपासणे आता अधिक गरजेचे झाले आहे. कारण थोडासा निष्काळजीपणा आपल्या आरोग्यासाठी मोठा धोका ठरू शकतो. तुम्हाला काय वाटत? कमेंट करा..





