
खानदेश, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. भुसावळ–पुणे हुतात्मा एक्सप्रेस आता अमरावतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
सध्या ही गाडी कल्याण व पनवेल वगळून कोपरगाव–दौंड मार्गे धावते. यामुळे जळगाव जिल्ह्यातील उद्योजक, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला मोठा फटका बसत असल्याचे सांगितले जात आहे. नाशिक, कल्याण व पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता मनमाड येथे उतरून इतर गाड्यांवर अवलंबून राहावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर भुसावळ–पुणे दरम्यान स्वतंत्र एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मनमाड–कोपरगाव–दौंड मार्गे नवीन गाडी सुरू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येत आहे.
या संदर्भात प्रवासी संघटनांनी मध्य रेल्वे च्या महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे.
आता रेल्वे प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे सर्व प्रवाशांचे लक्ष लागले आहे.





