
अहिल्यानगरमध्ये नेमकं चाललंय तरी काय? थकीत पगारासाठी एका साखर कामगारावर थेट सरकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न करण्याची वेळ आलीये. मंडळी, नगर तालुका साखर कारखान्यात काम करणारे अखिल सुभान शेख हे गेल्या अनेक वर्षांपासून थकीत पगारासाठी संघर्ष करत आहेत.
संबंधित साखर कारखाना सध्या बंद अवस्थेत असून त्याचा कार्यभार सहकारी संस्था कार्यालयाकडे आहे. मात्र, तब्बल तीन लाख ८० हजार रुपयांची थकबाकी अद्यापही मिळालेली नसल्याचा आरोप शेख यांनी केला. गेल्या अनेक वर्षांपासून ते कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या मारत होते. पण प्रत्येक वेळी केवळ उडवाउडवीची उत्तरं मिळत असल्याने ते प्रचंड तणावात होते.
अखेर संतापाच्या भरात त्यांनी सावेडी येथील सहकारी संस्था कार्यालय गाठले. धक्कादायक म्हणजे विशेष लेखा परीक्षकांच्या टेबलावर चढले आणि फाशी घेण्याचा प्रयत्न करू लागले. त्यामुळे कार्यालयात एकच गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अखिल शेख यांना ताब्यात घेतलं आणि मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेमुळे एक गंभीर प्रश्न पुन्हा समोर आलाय.
कामगारांना त्यांच्या हक्काचा पगार मिळवण्यासाठी इतक्या टोकाच्या पावलांपर्यंत का जावं लागतं? मंडळी, ही घटना फक्त एका कामगाराची नाही तर आर्थिक तणावात जगणाऱ्या हजारो कामगारांच्या वेदनेचं प्रतीक आहे. तुमचं मत काय? कमेंट करा..





