अहिल्यानगर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली. सोमवारी 7 एप्रिलला संगमनेरमधील दोन नामांकीत डाँक्टरांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला. संगमनेर शहरातील सोनांबेकर हाँस्पिटलमधील हे दोन्ही डाँक्टर आहेत. रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सकांनीही, या दोन्ही डाँक्टरांना रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा अहवाल दिला. त्यामुळे हे सगळं प्रकरण राज्यभर चर्चेत आलंय. नेमकं काय आहे हे प्रकरण? डाँक्टरांनी नेमकं काय केलंय?
27 फेब्रुवारीला, अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील दत्तात्रय दळवी हे संगमनेरमधील सोनांबेकर हाँस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांच्या छातीत दुखत असल्याची, त्यांची तक्रार होती. हाँस्पिटलमध्ये रुग्ण दाखल झाल्यावर त्यांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. 28 फेब्रुवारीला दळवी यांचे रक्ताच्या तपासण्या पाहिल्यानंतर या हाँस्पिटलमधील हृदयरोग तज्ज्ञ डाँ. अभिजीत कोरडे यांनी रुग्णाला स्टेन्ट टाकण्याचा सल्ला दिला. त्यानंतर 1 मार्चला या रुग्णार शस्त्राक्रिया झाली. तोपर्यंत सगळं नाँर्मल होतं. परंतु याच शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या हाताला गॅगरीन झाल्याचं निदान डाँक्टरांनी केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा या रुग्णाचं रक्त तपासणीसाठी पाठविण्यात आलं. त्यावेळी रुग्णाचं क्रिएटीन हे 4.91 वर गेल्याचं निदान झालं.
त्यावेळी एक डाँक्टर म्हणून या रुग्णालयातील डाँक्टरांनी योग्य सल्ला देणे आवश्यक होते, असा थेट आरोप रुग्णाच्या पत्नी मंगल दळवी यांनी केला. त्यांनी दाखल केलेल्या तक्ररीत म्हटले आहे की, ही तपासणी झाल्यावर यूरॉलॉजिस्ट किंवा नेफ्रॉलॉजिस्टचा सल्ला घेणे आवश्यक होते. परंतु केवळ खूप खर्च येणार आहे तुम्ही पैशांची व्यवस्था करा, नाहीतर रुग्णाला हलवा, असे सांगून डाँ. अभिजीत कोरडे व डाँ. अजिंक्य अशोक सोनांबेकर हे दोन्ही डॉक्टर निघून गेले.
तक्रारीत मंगल दळवी पुढे म्हणतात की, त्यानंतर आम्ही माझ्या पतीला 3 मार्चला नाशिक येथील एका रुग्णालयात दाखल केलं. तेथे गेल्यावर रुग्णाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा पूर्ण लाभ हा सोनांबेकर हाँस्पिटलनेच घेतल्याचं समोर आलं. शेवटी आमच्याकडे पैसे नसल्याने आम्ही रुग्णाला घोटी येथील रुग्णालयात हलवलं. तेथे तपासण्या केल्यावर रुग्णाच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्याचा रिपोर्ट आला. त्यानंतर 22 मार्च 2026 ला रुग्ण दत्तात्रय दळवी यांचं निधन झालं.
त्यानंतर दळवी कुटुंबाने या योजनेचा चुकीचा फायदा घेतला व चुकीचं निदान केल्याचा आरोप करत महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली. तेथून जिल्हा शल्यचिकित्सक डाँ. संजय घोगरे यांच्याकडे ही तक्रार आली. त्यांनी याबाबत समिती नेमली. या समितीने सोनांबेकर हॉस्पिटल व्यवस्थापन व डॉ. अभिजीत कोरडे हे सदर रुग्णाच्या मृत्यूस जबाबदार असल्याचे निश्चित केले. त्यानंतर याच अहवालानुसार मृताच्या पत्नी मंगल दळवी यांनी संगमनेर शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन डॉ. अभिजीत भाऊसाहेब कोरडे व डॉ. अजिंक्य अशोक सोनांबेकर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर हे करत आहेत. डाँक्टर दोषी आहेत का किंवा चुकीची ट्रिटमेंट दिलीय का, किंवा नेमकं काय झालंय, हा तपास पोलिस करत आहेत. या तपासानंतरच खरंच कुणी दोषी आहे का, हे समजणार आहे. त्यामुळे पोलिस तपास होईपर्यंत या प्रकरणावर काहीच सांगता येणार नाही. परंतु दोन डाँक्टरांविरोधात गु्न्हा दाखल झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे.





