
अहिल्यानगरमधील व्यावसायिक रमेश बोगा यांनी केलेल्या तक्रारीमुळे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. स्क्रॅप मालाच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून त्यांचे अपहरण करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
फिर्यादीनुसार, 29 मे रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास राजबीर गजराजसिंग मल्होत्रा जुगन राजबीर मल्होत्रा आणि शिवाजी चंद्रकांत थोरव यांनी रमेश बोगा यांना त्यांच्या घराजवळ गाठले. जबरदस्तीने वाहनात बसवून त्यांचे दोन मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावून घेतल्याचा आरोप आहे.
यानंतर त्यांना आळंदी येथील एका फ्लॅटमध्ये नेण्यात आले. तिथे मारहाण करत, “तुझ्यामुळे आमचे साडेचार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पैसे भर, नाहीतर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी तिन्ही संशयितांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.





